छ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”.
आज १९ फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिन....स्वाभिमानाने जगू पाहणाऱ्या बहुजन समाजाचे शिवरायांशी अतूट नाते आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्यातील रयतेच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. अत्याचारी आणि जुलमी राजवटीविरोधात स्वराज्यातील सामान्य माणूसही विद्रोह करू शकतो ही भावना शिवरायांनी निर्माण केली. शिवराय या देशातील सर्व सामान्य माणसाच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत ते यामुळेच. सामाजिक, राजकीय परिस्थितीने विफल झालेला सामान्य माणूस म्हणतो आज शिवराय हवे होते...'राजे पुन्हा जन्माला या...' परंतु छत्रपती आज पुन्हा जन्माला येवू शकत नाहीत हे वास्तव आहे. पण चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जो उत्तुंग विचार समाजाला दिला आहे तो आजही आपल्यामध्ये आहे. शिवचरित्र म्हणजे केवळ ढाल-तलवारीची लढाई नाही. शिवचरित्र एक विचार आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यास प्रेरित करणारा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. शिवरायांच्या चरित्रातून आपण नक्की काय शिकले पाहिजे या दृष्टीने आपणास विचार करणे गरजेचे आहे.
शिवरायांनी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेद केला नाही. जात, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टींवरून माणसाना एकमेकापासून वेगळे केले नाही. उलट सर्वाना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफून यशस्वी वाटचाल केली. शिवराय हे सर्व जाती-धर्मांना समान लेखणारे होते. म्हणूनच धर्मग्रंथांनी ब्राम्हणांना शिक्षा करू नये असे सांगितले असतानाही “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ?” अशी सडेतोड भूमिका शिवराय घेतात. त्यामुळेच अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला शिवरायांनी संपवले. स्वराज्याला विरोध करणारा माणूस कोणत्याही जाती-धर्मातील असला तरी तो स्वराज्याचा शत्रू आहे असेच शिवरायांनी मानले. त्यामुळेच स्वराज्याचे विरोधक जावळीचे चंद्रराव मोरे अथवा मोघलांना सामील झालेले संभाजी कावजी यानाही शिवरायांनी माफ केले नाही. शिवरायांच्या चरित्रातून आपण हा गुण घेतला पाहिजे. जातींचा तथाकथित वर्चस्ववाद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचाराने सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी स्त्रियांना फार मोठा सन्मान दिला. ज्या काळात स्त्रियांवर धर्मव्यवस्थेने अन्यायकारक बंधने लादली होती, त्या काळातही स्त्रीला देवतेची पर्यायाने अतिशय सन्मानाची वागणूक देणारा हा राजा होता. म्हणूनच गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश शिवरायांनी दिले. स्त्रियांबाबत इतकी सकारात्मक आणि उत्तुंग भूमिका घेणारे शिवराय एकमेवाद्वितीयच होते. शिवचरित्रातून हा गुण स्वीकारून प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्या घरातील आई, बहिण व इतर स्त्रियांना सन्मानकारक वागणूक द्यावी. त्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करून घ्यावे. घरातील मुलीना उच्च शिक्षण द्यावे.
अंधश्रद्धाना शिवरायांनी आपल्या आयुष्यात कधीही स्थान दिले नाही. शिवरायांनी अनेक किल्ले बांधले. काही किल्ल्यांची डागडुजी केली. परंतु कोणत्याही किल्ल्यावर सत्यनारायण पूजा घातली नाही. अनेकवेळा किल्ल्यांचे बांधकाम करताना सापडलेल्या धातूंच्या देवाच्या मूर्ती वितळवून स्वराज्यासाठी खजिना उभा केला. शिवरायांच्या सर्व लढाया अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीच असत. परंतु शिवरायांचे नाव पावलोपावली घेणारे आपण मात्र प्रत्येक गोष्ट करताना मुहूर्ताचे थोतांड माजवत बसतो. महात्मा फुले म्हणतात, “प्रत्येक लढाई मुहूर्त पाहूनच करणारी पेशवाई बुडाली आणि मुहूर्त न बघणारे इंग्रज जिंकले”. शिवराय अंधश्रद्धा मुक्त होते. त्यांचा आदर्श मानून आपणही अंधश्रद्धा आणि फालतू थोतांडाना तिलांजली दिली पाहिजे.
आज शिवराय असते तर ?
राजे पुन्हा जन्माला या....अशा प्रकारची वाक्ये आपण पुन्हा-पुन्हा बोलतो. शिवरायांना जे आयुष्य मिळाले ते त्यांनी सत्कारणी लावले. आयुष्यभर न्यायाने वाटचाल करून स्वराज्य उभे केले. स्वाभिमानी रयतेची निर्मिती केली. शिवरायांनी दिलेला विचार आजही आमच्या डोक्यात आहे. तरीही आपण कर्तुत्व न गाजवता शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून साकडं घालत असू तर शिवरायांचे नाव घ्यायचा अधिकार आपल्याला नाही. आणि आज शिवराय पुन्हा जन्माला आले तरी ते ढाल-तलवारीची लढाई करणार नाहीत. आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञान-संगणकाचे युग आहे. शिवरायांनी आज लेखणी हातात घेतली असती. गरिबांना नाडणाऱ्या राज्यकर्ते, सावकार आणि धर्ममार्तंडावर ती लेखणी रोखली असती. संगणकाचे ज्ञान प्राप्त करून जगावर राज्य करण्याची धमक बाळगली असती. आज आपणालाही याच मार्गाने जायचे आहे. केवळ जय शिवाजी...म्हणून शिवरायांच्या कार्याचे खरे चीज होणार नाही. त्यांचे विचार आणि कार्य प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याशिवाय आपण स्वतःला 'शिवभक्त' म्हणवून घेणे योग्य नाही.
शिवचरित्रातून आपण आज हा संदेश घेतला पाहिजे. आदर्श स्वराज्य निर्माण करून माणसांना जोडणाऱ्या या राजाला विनम्र वंदन...
4 टिप्पणी(ण्या):
आजच्या काळात शिव चरित्रातून काय घ्यावे हे आपण फार छान पद्धतीने सांगितले आहे. मी सह्याद्री बाणाचा नियमित वाचक आहे. असेच लेखन करत राहा. माझ्या शुभेच्छा.
अप्रतिम लेख. तुमचा ब्लॉग मी वाचला. अतिशय छान लेखन केले आहे. काही मुद्दे मला पूर्णपणे पटले नाहीत. त्यावर चर्चा होवू शकते अशी आपण भूमिका घेतली आहे हे आवडले. तुमचं संपर्क क्रमांक ब्लॉग वार आहेच. मी तुमच्याशी संपर्क करतो, आपण बोलू. तुमचे विचार मला संतुलित वाटतात.
prakash pol saheb,
जातींचा तथाकथित वर्चस्ववाद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचाराने सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे
Ase mhnta matra brahman dvesh karta.....
Ya dutappipanala kaay mhnave????
@Anonymous-
आपल्या म्हणण्यानुसार मी ब्राह्मणद्वेष करतो. मोघम आरोप करण्यापेक्षा मी कधी ब्राम्हणांचा द्वेष केला ते सांगितले असते तर बरे झाले असते. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही चिकित्सेला ब्राह्मणद्वेष समजता. सगळे ब्राम्हण वाईट असतात अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. किंवा ब्राम्हण आहे म्हणून एखाद्याला झोडपायचे असेही मी करत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल लिहिताना पारंपारिक, ऐकीव, खोट्या, मतलबी बाजूला न भुलता नवीन पुरोगामी भूमिका घेणे मला योग्य वाटते. त्यात एखाद्याचे हितसंबंध गुंतलेले असले तर अशा व्यक्तींना ही स्वतंत्र आणि पुरोगामी भूमिका पटत नाही. मग ते लगेच बोंब ठोकतात. जातीवाद आणि ब्राम्हणद्वेषाचा आरोप करतात.
शिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात. काहीही करून कर्तुत्ववान व्यक्तीला ब्राम्हणी व्यवस्थेपुढे बांधून टाकायचे हे आपले धोरण असते. त्यातून जर अशा व्यक्तींना मुक्त करून त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडायचे म्हटले की आपली कोल्हेकुई सुरु होते.
शिवराय आणि एकूणच सर्व महापुरुषांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात खोटा लिहिला गेला. याला बहुतांशी ब्राम्हण लेखक जबाबदार आहेत, कारण लेखणी त्यांच्याच हातात होती. आता नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर पूर्वीच्या लेखकांनी काय चुका केल्या ते दाखवणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे खरा इतिहास मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळेच रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु म्हणून आजपर्यंत शिकवले जात असताना नवीन संशोधनानुसार या दोघांचाही शिवाजी राजांशी गुरु-शिष्याचा संबंध नाही हे उघड झाले आहे. मग या दोघांना राजांच्या गुरुपदी बसविण्याचा खटाटोप इतिहासकारांनी का केला याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. बहुजन समाजात कर्तुत्ववान माणूस जन्मू शकत नाही, आणि जर असा माणूस जन्माला आलाच आणि कर्तुत्ववान झालाच तर त्याचा गुरु/पिता ब्राम्हण असला पाहिजे. कारण ब्राम्हण मार्गदर्शक असल्याशिवाय बहुजन समाजातील व्यक्ती कर्तुत्व गाजवू शकत नाही हा ब्राम्हणी अहंकार/मानसिकता धोकादायक आहे. आमचा विरोध या मानसिकतेला आहे. चुका करणारे बहुतांशी ब्राम्हण होते त्यामुळे त्यांना दोष देणे म्हणजे ब्राह्मणद्वेष करणे नव्हे हे समजून घ्या. प्रामाणिक ब्राम्हण लोकांना आमचा विरोध नाही. उलट त्यांच्या नैतिक कार्यात आम्ही त्यांना सहकार्याच करू. मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो. तुमच्या दुर्दैवाने अशा लोकांपैकी बहुतेक लोक ब्राम्हण असल्याने आम्ही नेहमीच ब्राम्हणांचा द्वेष करतो असे आपणाला वाटते पण ते खरे नाही.
मला वाटते आपण स्वतः आत्मपरीक्षण करावे. प्राचीन काळी ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे खापर आम्ही आताच्या ब्राम्हणांवर फोडणार नाही कारण पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राम्हणांना देणे अनैतिक आहे. परंतु आताच्या ब्राम्हणांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आपण किती प्रामाणिक आहोत ते पहावे. बहुजन समाज, स्त्रिया यांच्याबद्दल आपली काय मते आहेत ती माणुसकीच्या पातळीवर उतरणारी आहेत काय हेही तपासावे. आणि स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ